शनिवार, जुलै ०९, २०११

मधुरात्र

काही काळापुर्वी सुचलेल्या ओळी, पण त्या पूर्ण केल्याच नाहीत कधी……….

आजही आहे माझ्या मधुरात्र ती लक्षात ग,
चांदणे अवघ्या तनुवर चंद्र अन् वक्षात ग।

उत्तररात्रीतही उतरेना उन्मत्त ते आवेग ग,
उत्तर ना यास उतारा लगाम ना वेग ग।

स्मित ते विसरु कसे स्मरतो हरेक नखरा ग,
लज्जा खोटी रागही लटका, हां भाव तुझा न खरा ग।
=============================

आज त्यात भर घातलेल्या काही ओळी…..
________________________________________

करू नकोस उगाच सये रुसण्याचे रूक्ष बहाणे,
मार्दवाची आर्जवे करून वेडावती शहाणे।

खेळ केला तारकांनी चंद्र वेडावला बिचारा,
पूर ओसरून गेला कोरडा वेडा किनारा।

घे मला जवळि आता दूर लोटू नको गडे,
कोसळावे काय आता संयमाचे उंच कड़े।

रातराणीच्या फुलांचा गंध हां विरेल ग,
निशेस्तव रातकिडा रातदिन झुरेल ग.
=============================
-विशाल सिनकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा