गुरुवार, मे २६, २०११

प्रेम तुझं खरं असेल तर....

ही कविता म्हणजे, प्रेमात हताश, निराश झालेल्या एका प्रेमवीराला, त्याच्या 
मित्रा कडून दिलेला सल्ला, नवी उमेध, नवी चेतना…….




प्रेम तुझं खरं असेल तर 
जीव तुझ्यावर ओवाळेल ती 
स्वत:च्याचं भावनांचं मन 
शेवटी ती मारेल तरी कीती.. 

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर 
तीही त्यात वाहून जाईल 
मनावर अमृत सरी झेलत 
तीही त्यात न्हाहून जाईल.. 

विचार तुझा नेक असेल, तर 
तीही तुझा विचार करेल 
हृदयाच्या तिच्या छेडून तारा 
सप्तसूरांचा झंकार उरेल.. 

आधार तुझा बलवान असेल, तर 
तीही तूझ्या कवेत वाहील 
मग, कितीही वादळं आलीत 
तरी प्रित तुमची तेवत राहील.. 

आशा सोडण्या इतकं 
जिवन निराशवादी नाही रे 
तिला जिंकता यावं इतकं 
मानवी हृदय पौलादी नाही रे.. 

पण, मित्रा जर ती नाहीचं आली 
तरीही तू हार मानू नकोस 
तू तर प्रामाणिकपणे खेळलास 
आयुष्याला जुगार मानू नकोस.. 

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं 
थांबत नाही ते कोणासाठी 
घे भरारी पुन्हा गगनी 
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी. 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा